पिंपरी-चिंचवड :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिवंगत ज्येष्ठ नगरसेवक जावेद शेख यांच्या कुटुंबातील कोणालाही पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत उमेदवारी न दिल्यामुळे नाराजी व्यक्त होत असून, त्यांचे सुपुत्र तौहीद शेख यांनी प्रभाग क्रमांक 14 मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ते “पुस्तक” या चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
आकुर्डी येथे आयोजित पत्रकार परिषदेत तौहीद शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि पक्ष नेतृत्वावर गंभीर आरोप केले. त्यांनी सांगितले की, जावेद शेख यांनी तीन टर्म नगरसेवक म्हणून प्रभागासाठी प्रामाणिकपणे काम केले. मात्र, त्यांच्या कार्याची दखल पक्षाने घेतली नाही. केवळ जातीच्या आधारावर उमेदवारी नाकारण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
तौहीद शेख म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरातील 32 प्रभागांपैकी एकाही प्रभागात अल्पसंख्याक समाजातील उमेदवाराला तिकीट देण्यात आलेले नाही. तसेच, प्रभाग 14 मध्ये एकाच घरातील दोन व्यक्तींना उमेदवारी देण्यात आली असून, ही बाब कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण करणारी आहे.
या निवडणुकीसाठी तौहीद शेख आणि त्यांच्या मातेकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी किमान एक तरी उमेदवारी मिळावी, ही अपेक्षा होती. मात्र, पक्षाने ती पूर्णपणे दुर्लक्षित केल्याचे त्यांनी सांगितले. या अन्यायकारक निर्णयामुळेच आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दिवंगत नगरसेवक जावेद शेख यांचे पुत्र असलेले तौहीद शेख यांनी वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी सार्वजनिक जीवनात प्रवेश करण्यामागील भूमिका स्पष्ट केली. लहानपणापासून परिसरातील समस्या, नागरिकांचे प्रश्न आणि त्यासाठी सुरू असलेला संघर्ष पाहत मोठे झालो. काहीतरी बदल घडवण्याचा विचारच मला पुढे जाण्याची प्रेरणा देतो, असे ते म्हणाले.
वडिलांच्या राजकीय वारशाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, प्रामाणिकपणा, सर्वसामान्यांशी थेट संवाद आणि दबावाला न झुकता काम करण्याची शिकवण त्यांनी दिली. त्या मूल्यांना आजच्या काळानुसार पारदर्शकता, जबाबदारी आणि युवकांच्या सहभागासह पुढे नेण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यामागील कारण स्पष्ट करताना ते म्हणाले की, पक्षीय चौकटीपेक्षा थेट जनतेशी जोडलेले राहणे मला अधिक महत्त्वाचे वाटते. ही निवडणूक शेवट नाही, तर सुरुवात आहे. निकाल काहीही असो, समाजकार्य आणि प्रभागातील प्रश्नांवर माझा संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
शेवटी मतदारांना आवाहन करताना तौहीद शेख म्हणाले, “ही निवडणूक पक्षांची नसून विचारांची आहे. पुस्तक या चिन्हावर मतदान करून स्वच्छ, पारदर्शक आणि विकासाभिमुख राजकारणाला साथ द्या.”
