
पिंपरी, दि. ६ मार्च (संपादक) : शाम सोनवणे –
पुण्यातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरात एक खळबळजनक जमीन गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आले आहे. जमिनीच्या हव्यासापोटी एका शेतकरी कुटुंबावर दबाव टाकून त्यांना संशयास्पद मृत्यूला कारणीभूत ठरल्याच्या गंभीर आरोपावरून हुलावळे कुटुंबाने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली आहे. या तक्रारीमध्ये काही बड्या जमीन व्यावसायिकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
नेमके प्रकरण काय ?
हिंजवडी येथील विशाल दत्तात्रय हुलावळे, विवेक अर्जुन हुलावळे आणि अर्जुन म्हातु हुलावळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मौजे हिंजवडी येथील सर्व्हे क्र. ६० आणि ६३/३ ही त्यांच्या मालकीची शेती जमीन आहे. या जमिनीच्या व्यवहारासाठी आरोपी अविनाश गणपत पाटील आणि श्रीपाद विमलचंद मेहता यांना मुखत्यारपत्र (Power of Attorney) द्यायचे ठरले होते. मात्र, आरोपींनी शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत विकसन करारनाम्याच्या नावाखाली परस्पर खरेदीखत करून फसवणूक केल्याचा आरोप फिर्यादींनी केला आहे.
दोन वृद्धांचा संशयास्पद मृत्यू
हुलावळे कुटुंबाने अर्जात नमूद केले आहे की, जमिनीची न्यायालयीन प्रकरणे मागे घेण्यासाठी आरोपींकडून सतत धमकावले जात होते. या सातत्यपूर्ण दबावामुळे आणि प्रत्यक्ष दिलेल्या धमक्यांमुळे फिर्यादीचे वडील दत्तात्रय म्हातु हुलावळे यांचा १० सप्टेंबर २०२४ रोजी हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच त्यांचे चुलते काळुराम म्हातु हुलावळे यांचाही ९ फेब्रुवारी २०२५ रोजी संशयास्पद मृत्यू झाला. या दोन्ही मृत्यूंना आरोपींचा दबावच कारणीभूत असल्याचा थेट आरोप कुटुंबाने केला असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
पोलिसांशी ‘सेटिंग’ ची धमकी
तक्रारीत म्हटले आहे की, मे २०२५ मध्ये काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी हुलावळे यांच्या घरी जाऊन महिलांना धमकावले. “आमचे पोलिसांशी सेटिंग झाले आहे, आम्ही जमिनीचा ताबा लवकरच घेणार, मध्ये आलात तर खोट्या गुन्ह्यात अडकवू,” अशी धमकी या व्यक्तींनी दिली. आरोपी हे आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या अतिशय प्रभावशाली असल्याने स्थानिक पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नसल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे.
आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी
या प्रकरणात मुख्यत्वे अविनाश गणपत पाटील, श्रीपाद विमलचंद मेहता, मयूर वसंतलाल शेठिया आणि विजय विष्णू प्रसाद मर्दा यांची नावे घेण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, आरोपी विजय मर्दा याच्यावर अहिल्यानगर (अहमदनगर) येथे कित्येक कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीचे गुन्हे दाखल असून त्याला यापूर्वी अटकही झाली होती. या आरोपींनी मुळशी तालुक्यात सुमारे २००० एकर इतके क्षेत्र गोळा केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
शेतकऱ्यांची केविलवाणी साद
“आम्ही सामान्य शेतकरी असून आमच्याकडे या जमिनींव्यतिरिक्त दुसरे उत्पन्नाचे साधन नाही. आमची कोणाही वरिष्ठ पोलीस अधिकारी किंवा मंत्र्यांशी ओळख नाही,” असे हुलावळे यांनी अर्जात म्हटले आहे. आरोपींनी साम, दाम, दंड, भेद वापरून आम्हाला देशोधडीला लावले असून भविष्यात कुटुंबाच्या जिवाचे काही बरेवाईट झाल्यास त्याला आरोपीच जबाबदार राहतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा, अशी कळकळीची विनंती हुलावळे कुटुंबाने केली आहे.
