दापोडीत विषारी दारूमुळे ३० नागरिकांचा मृत्यू झाल्याचा संशय; पोलीस आकडा लपवत असल्याचा नरेंद्र बनसोडे यांचा गंभीर आरोप; शहरात तीव्र नागरी आंदोलनाचा इशारा

संपादक – शाम सोनवणे :-
पिंपरी-चिंचवड:
पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीतील दापोडी आणि फुगेवाडी परिसरात विषारी दारूच्या सेवनाने काही नागरिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरातील अनधिकृत दारूगुत्त्यांवरून मृत्यूचा बाजार राजरोसपणे सुरू असल्याचे उघड झाले असून, संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराची कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र आहे. या गंभीर घटनेचा निषेध करत, राज्याला तात्काळ पूर्णवेळ गृहमंत्री देण्यात यावा आणि सद्यस्थितीला जबाबदार असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या गृहमंत्रीपदाचा तातडीने राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे.
पोलिसांनी कंत्राटदार-नफेखोरांशी हातमिळवणी केल्याचा संशय
या भीषण घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच त्यांनी दापोडी पोलीस स्टेशनला भेट देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना नरेंद्र बनसोडे यांनी अत्यंत खळबळजनक दावा केला. ते म्हणाले, “विषारी दारूमुळे मृत्युमुखी पडलेले मजूर आणि तरुण यांची संख्या जवळपास ३० च्या आसपास असल्याचे समजते आहे. |मात्र, पोलीस प्रशासनाकडून हा आकडा जाणीवपूर्वक लपवला जात असल्याचा तीव्र संशय आम्हाला आहे.”
मृतांमध्ये प्रामुख्याने संजयनगर, कुष्ठरोग्यांची वसाहत, स्थानिक झोपडपट्टी आणि आझाद चौक परिसरातील गरीब नागरिकांचा समावेश आहे. हे सर्व मृत नागरिक अवघ्या ४०० मीटरच्या परिघात राहणारे होते. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, स्थानिक पोलीस स्टेशनपासून अवघ्या काही मीटर अंतरावर हा अवैध दारूचा गुत्ता गेल्या १५ वर्षांपासून खुलेआम सुरू होता. हा प्रकार म्हणजे पोलिसांच्या आशीर्वादाने आणि प्रशासनाशी हातमिळवणी करून दारूचे साम्राज्य थाटणाऱ्या नफेखोर व्यावसायिकांचा छुपा करार आहे. त्यामुळे या प्रकरणाची विशेष यंत्रणेद्वारे सखोल चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित केले पाहिजे.
पिंपरी-चिंचवड बनले अवैध धंद्यांचा अड्डा
शहरातील एकूणच बिघडलेल्या सुरक्षिततेवर बोट ठेवत नरेंद्र बनसोडे यांनी राज्य सरकारवर कडक शब्दांत प्रहार केला. ते म्हणाले कि, पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही महिन्यांत गुन्हेगारीने टोक गाठले आहे. ठिकठिकाणी गाड्यांची तोडफोड करणे, अल्पवयीन मुली मोठ्या प्रमाणात बेपत्ता होणे, खून, मारामार्या, आणि किरकोळ कारणांवरून थेट कोयत्याचा वापर करणे अशा घटना रोज घडत आहेत. शहरात ‘कोयता गँग’ची मोठी दहशत निर्माण झाली असून दुकानांवर हल्ले केले जात आहेत. नुकतीच खंडणीसाठी एका नामांकित व्यावसायिकाच्या दुकानावर जाहीर गोळीबाराची घटना घडली. या सर्व समाजविघातक प्रवृत्ती राजरोसपणे सक्रिय झाल्या असून, त्यांना रोखण्यात स्थानिक पोलीस बळ पूर्णपणे असमर्थ ठरले आहे. एकंदरीतच पिंपरी-चिंचवड शहर आता काळ्या धंद्यांचा, गुन्हेगारीचा, पोलिसी भ्रष्टाचाराचा आणि अवैध व्यवसायांचा मुख्य अड्डा बनले आहे.
लोकप्रियता वाचवण्यासाठी नागरिकांच्या जीवाशी खेळ: काँग्रेसचा आरोप
मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्लाबोल करताना काँग्रेस शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी सांगितले की, गेल्या अनेक महिन्यांपासून आमची मागणी आहे की महाराष्ट्राला एक स्वतंत्र आणि पूर्णवेळ गृहमंत्री मिळायला हवा. परंतु, गृहमंत्री पदावर अतोनात प्रेम असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या पदाला चिकटून बसले आहेत. त्यांना राज्यातील आणि शहरातील या गंभीर बाबींचा आढावा घेण्यासाठी अजिबात वेळ नाही. त्यांना केवळ मोठमोठ्या प्रकल्पांचा गाजावाजा करून सवंग लोकप्रियता मिळवण्यात रस आहे. मात्र गुन्हेगारांवर वचक बसवण्यात आणि सर्वसामान्यांना सुरक्षा देण्यात त्यांची भूमिका पूर्णपणे अपयशी ठरली आहे. महिला, अल्पवयीन मुले आणि नवविवाहितांवर होणारे अत्याचार तसेच हुंडाबळीच्या वाढत्या घटना या गोष्टीची साक्ष आहेत. पॉक्सको (POCSO) न्यायालयाला मंजुरी मिळूनही ती महाराष्ट्रात का उभी राहिली नाहीत? राज्यातील वाढत्या गुन्ह्यांचे ऑडिट का केले जात नाही? जनतेला खरे आकडे सांगायला सरकार का घाबरत आहे? स्वतःची लोकप्रियता घसरू नये म्हणून नागरिकांना वेठीस धरून त्यांच्या जीवाशी खेळ खेळण्याचे काम राज्य सरकारच्या आशीर्वादाने सुरू आहे.
काँग्रेस पक्षाच्या ४ प्रमुख मागण्या:
या भीषण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने प्रशासनासमोर खालील मागण्या ठेवल्या आहेत:
- १) गृहमंत्रीपदाचा राजीनामा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि राज्याला त्वरित पूर्णवेळ गृहमंत्री नेमावा.
- २) दोषी अधिकाऱ्यांचे निलंबन: दापोडीतील या विषारी दारूच्या गंभीर प्रकाराला जबाबदार असणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात यावे.
- ३) पीडित कुटुंबांचे पुनर्वसन: या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या गरीब नागरिकांच्या कुटुंबांचे तात्काळ पुनर्वसन करून त्यांना शासनातर्फे भरीव आर्थिक मदत देण्यात यावे.
- ४) अवैध धंदे मुळासकट नष्ट करा: पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व प्रकारचे अवैध धंदे, मटका, आणि दारूगोठे पोलिसांच्या माध्यमातून तात्काळ नष्ट करण्यात यावेत आणि त्याबाबत काय कारवाई केली, याचा सविस्तर खुलासा पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करावा.
तीव्र आंदोलनाचा इशारा: “या मागण्यांवर जर येत्या काही दिवसांत राज्य शासनाने आणि पोलीस प्रशासनाने सकारात्मक व कडक पावले उचलली नाहीत, तर काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी शेवटी दिला आहे
