संपादक – शाम सोनवणे
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) आगामी २०२६ च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ‘साहित्य संवर्धन आघाडी‘ने रणशिंग फुकले आहे. “गेली दहा वर्षे परिषदेत सुरू असलेली अनिर्बंध सत्ता आणि पारदर्शकतेचा अभाव याला लगाम लावण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवत आहोत,” असे प्रतिपादन आघाडीच्या प्रमुख उमेदवारांनी कासारवाडी येथील हॉटेल कलासागर येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.
बदलाची लाट आणि शंभराव्या संमेलनाचा संकल्प
अध्यक्षपदाचे उमेदवार योगेश सोमन यांनी यावेळी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, “साहित्य हे प्रवाही असायला हवे, मात्र गेल्या दहा वर्षांपासून या कार्यकारिणीत बदल झालेला नाही. शंभराव्या साहित्य संमेलनानिमित्त १०० पुस्तकांचे प्रकाशन आणि भव्य पुस्तक महोत्सव आयोजित करण्याचा आमचा मानस आहे. पोस्टल बॅलेटद्वारे होणाऱ्या या निवडणुकीत सर्वांना समान संधी मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”
लोकशाही आणि पारदर्शकतेचा अभाव
प्रमुख कार्यवाह पदाच्या उमेदवार डॉ. स्वाती महाळंक यांनी विद्यमान प्रशासनावर जोरदार टीका केली. “अनेक सदस्यांना आपल्याला मतदान करायचे आहे हेच माहिती नाही. साहित्यातील व्यवहार आणि पारदर्शकता वाढवायची असेल, तर लोकशाही मार्गाने निवडून येणे हाच एकमेव मार्ग आहे. नव्या लोकांना संधी देणे आता काळाची गरज आहे,” असे त्यांनी नमूद केले.
मतदार यादीत सावळागोंध: संदीप तापकीर यांचे गंभीर आरोप
पुणे जिल्हा कार्यवाह पदाचे उमेदवार संदीप भानुदास तापकीर यांनी मतदार यादीतील धक्कादायक त्रुटी समोर आणल्या. त्यांनी प्रतिस्पर्धी राजन लाखे यांच्यावर थेट आरोप करत विचारले की, “फक्त पिंपरी चिंचवड शाखेतच ९१९ सदस्य कसे ? इतर ११२ शाखांमध्ये जेमतेम १५० सदस्य असताना हा आकडा संशयास्पद आहे.”
तापकीर यांनी उपस्थित केलेले मुख्य मुद्दे:
- मृतांची नावे: आळंदीच्या मतदार यादीत कै. ह.भ.प. साखरे महाराज आणि विठ्ठल चौधरी महाराज यांसारख्या मृत सदस्यांची नावे अद्यापही कायम आहेत.
- दुबार नावे: मंचरच्या यादीत २२, चाकण-राजगुरुनगरमध्ये गिलबिले यांची तर तळेगावमध्ये प्रभाकर ओवाळ यांची नावे दोनदा आढळतात.
- घराणेशाही: मतदार यादीच्या पहिल्या नऊ पानांत शिरवळ आणि मुरकुटे या परिवारातीलच सर्व सदस्य आहेत. हे सर्व साहित्यिक आहेत का? असा टोला त्यांनी लगावला.
प्रामाणिक कामाला मत द्या: प्रदीप निफाडकर
कोषाध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीप निफाडकर यांनी मतदारांना आवाहन केले की, “केवळ पेपरला फोटो येण्यासाठी धडपडणाऱ्यांना निवडून द्यायचे की साहित्यासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना, हे ठरवण्याची हीच योग्य वेळ आहे. खोट्या सह्या करणाऱ्या प्रवृत्तींना रोखण्यासाठी सुज्ञ मतदारांनी आम्हाला साथ द्यावी.”
मतदारांसाठी महत्त्वाची माहिती: - मतदान पद्धत: टपालाने (पोस्टल बॅलेट).
- मतपत्रिका वितरण: ६ फेब्रुवारीपासून मतदारांच्या पत्त्यावर पाठवण्यास सुरुवात.
- अंतिम मुदत: १२ मार्च २०२६ पूर्वी मतपत्रिका परिषदेच्या कार्यालयात पोहोचणे आवश्यक.
