पिंपरी, दि. 27 मे 2026 (जनता टाइम्स) – शाम सोनवणे – संपादक –
आगामी मान्सूनमध्ये संभाव्य अतिवृष्टी, पाणी साचणे आणि पूरजन्य परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका पूर्णपणे सज्ज झाली आहे. नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत सर्व क्षेत्रीय कार्यालय स्तरावर 24×7 पूर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मान्सून कृती आराखडा 2026’ तयार करून तो तातडीने कार्यान्वित करण्यात आला आहे.
L0 ते L4 स्तरावर पूरस्थितीचे वर्गीकरण :-
महापालिकेने पूरस्थितीचे L0 ते L4 अशा विविध स्तरांमध्ये वर्गीकरण केले आहे. नदीपात्रातील पाण्याची पातळी, पवना-मुळशी धरणातील विसर्ग आणि हवामान खात्याच्या अंदाजानुसार टप्प्याटप्प्याने उपाययोजना केल्या जाणार आहेत. धरण विसर्ग वाढल्यास नदीकाठच्या वस्त्या व सखल भागात मेगाफोन व सार्वजनिक ध्वनीक्षेपकाद्वारे नागरिकांना सतर्क केले जाईल. गरज भासल्यास नागरिकांचे सुरक्षितस्थळी तातडीने स्थलांतर करण्यात येईल.
मदत शिबिरे व बचाव यंत्रणा सज्ज :-
संभाव्य पूरग्रस्त नागरिकांसाठी शाळा इमारतींमध्ये मदत शिबिरे उभारली जाणार असून तिथे निवारा, अन्न, पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छता व आरोग्य सुविधा पुरवल्या जातील. अग्निशामक विभागाने रबर बोटी, लाईफ जॅकेट, दोरखंड व प्रशिक्षित पथके सज्ज ठेवली आहेत. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात ‘जलद प्रतिसाद पथक’ (QRT) तैनात राहणार असून नावाडी, जीवरक्षक, सर्पमित्र व स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे.पूर्वतयारीची कामे युद्धपातळीवरपावसाळ्यापूर्वी नालेसफाई, गटारसफाई व रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची कामे जोरात सुरू आहेत. पाणी उपसा पंप, पोर्टेबल पंप, जेसीबी, क्रेन व डंपर सज्ज ठेवण्यात आले आहेत. नदीकाठची अतिक्रमणे, धोकादायक व मोडकळीस आलेल्या इमारती, होर्डिंग्ज व मोबाईल टॉवर्सची तपासणी करून कारवाई सुरू आहे. विद्युत खांब, डीपी बॉक्स व ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती करून पूरस्थितीत पर्यायी प्रकाश व्यवस्था केली जाणार आहे.
आरोग्य व पाणीपुरवठ्यावर विशेष भर:-
दूषित पाणी पिण्याच्या वाहिन्यांमध्ये मिसळू नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. आरोग्य विभागामार्फत धुरीकरण, औषध फवारणी व स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. सर्व रुग्णालये, रुग्णवाहिका व सर्पदंशावरील औषधे सज्ज ठेवली आहेत. धोकादायक झाडांची छाटणी करून वीजवाहिन्यांवरील फांद्या हटवल्या जात आहेत.
वाहतूक व संप्रेषण व्यवस्था:-
पूरामुळे बाधित होणाऱ्या रस्त्यांचे सर्वेक्षण करून पर्यायी मार्ग निश्चित केले जाणार आहेत. बॅरिकेड्स, इशारा फलक व पाणीपातळी निर्देशक बसवले जातील. सर्व नियंत्रण कक्ष व विभागीय कार्यालयांमधील वायरलेस व इंटरनेट यंत्रणा 24×7 सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. जनसंपर्क विभागामार्फत आपत्कालीन सूचना वेळोवेळी प्रसारित केल्या जातील.
‘नागरिकांनी सहकार्य करावे’ – आयुक्तांचे आवाहन -“पावसाळ्यात नागरिकांच्या जीवित व मालमत्तेची हानी टाळणे, तात्काळ मदत व बचावकार्य राबविणे हे आमचे प्राधान्य आहे. सर्व विभागांनी सतर्क राहून जबाबदारीने काम करावे. नागरिकांनीही प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे,” असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले. अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे म्हणाले, “पूरनियंत्रण, नागरिकांचे स्थलांतर, मदत शिबिरे व पाणी उपसा यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. क्षेत्रीय कार्यालयांनी समन्वयाने काम करून तातडीने मदत द्यावी.” पूर ओसरल्यानंतर तातडीने स्वच्छता मोहीम राबवली जाणार असून गरज पडल्यास एनडीआरएफ व इतर यंत्रणांची मदत घेतली जाणार आहे.
