पिंपरी-चिंचवड: शाम सोनवणे

बोधगया येथील महाबोधी महाविहाराचे सर्व अधिकार बौद्धांना मिळावेत आणि १९४९ चा ‘बीटीएमसी’ (BTMC) ॲक्ट रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी १२ फेब्रुवारी २०२६ रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे भव्य आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. भंते विनयाचार्य यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनात सहभागी होण्यासाठी पुण्यातील शेकडो भिक्खू संघ, भिक्खुणी संघ आणि हजारो उपासक दिल्लीकडे रवाना झाले आहेत.
तक्षशिला बुद्ध विहारातून प्रवासाचा प्रारंभ
या आंदोलनाची सुरुवात आकुर्डी येथील तक्षशिला बुद्ध विहारातून झाली. बुधवारी सकाळी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भीमसृष्टी स्मारकाला अभिवादन करून हा ताफा नाशिक-इंदूर मार्गे दिल्लीकडे मार्गस्थ झाला. पुण्यातील या मोर्चाचे नेतृत्व भंते धम्मानंद करत आहेत.
राजकीय आणि सामाजिक पाठिंबा
या आंदोलनाला ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी भंते विनयाचार्य यांच्याशी सविस्तर चर्चा करून आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. यामुळे आंदोलनाला मोठी राजकीय ताकद मिळाली आहे.
उपासकांकडून सेवेचा ओघ
आंदोलनासाठी जाणाऱ्या अनुयायांची गैरसोय होऊ नये, यासाठी स्थानिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे:
तक्षशिला बुद्ध विहार, आकुर्डी: विहाराच्या अध्यक्षा निर्मला वालकर आणि सचिव मंगला मुनेश्वर यांनी आंदोलकांच्या चहा-नाष्ट्याची उत्तम व्यवस्था केली.
स्वरांजली कला क्रीडा मंच: अध्यक्ष यशवंत डोळस यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड व भोसरी येथील कार्यकर्त्यांनी दिल्लीपर्यंतच्या संपूर्ण प्रवासासाठी भोजन आणि पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे.या आंदोलनामध्ये आमचा सहभाग आहे यातच खूप मोठे समाधान आहे,असे मत अध्यक्ष यशवंत डोळस यांनी व्यक्त केले
प्रमुख मागण्या काय आहेत?
आंदोलनाचे मुख्य सूत्र १९४९ चा बोधगया टेंपल मॅनेजमेंट कमिटी (BTMC) कायदा रद्द करणे हे आहे. या कायद्यामुळे महाविहाराच्या व्यवस्थापनात बौद्धांसोबतच इतर घटकांचाही समावेश आहे, जो पूर्णपणे बौद्धांच्या स्वाधीन असावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे.
जंतर-मंतरवर होणाऱ्या या आंदोलनाकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
