पिंपरी-चिंचवड: शाम सोनवणे
औंध-रावेत बीआरटी रोडवरील रक्षक चौकात उभारण्यात येत असलेला उड्डाणपूल सध्या राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी पुलाच्या तांत्रिक त्रुटींवरून प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर, आता भाजप नगरसेविका आरती चोंधे यांनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. या वादामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
बारणे यांचा इशारा:
‘अपघात झाल्यास गुन्हा दाखल करू’काही दिवसांपूर्वी खासदार श्रीरंग बारणे यांनी पुलाच्या कामाची पाहणी केली होती. यावेळी पुलाचा उतार तीव्र असल्याचा दावा करत त्यांनी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले. “भविष्यात या पुलावर अपघात झाल्यास संबंधित कन्सल्टंट आणि अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा लागेल,” असा कडक इशारा त्यांनी प्रशासनाला दिला होता.
आरती चोंधे यांचा प्रतिसवाल:
‘काम संपतानाच का सुचते?’खासदार बारणे यांच्या इशाऱ्याला उत्तर देताना प्रभाग क्रमांक २६ च्या भाजप नगरसेविका आरती चोंधे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. बुधवारी पुलाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
चोंधे म्हणाल्या की:”गेल्या दोन वर्षांपासून पुलाचे काम सुरू असताना खासदार बारणे यांनी पाहणी का केली नाही ? “
“प्रकल्प अंतिम टप्प्यात आल्यावरच आक्षेप घेण्यामागे नेमका काय हेतू आहे?” “महापालिकेच्या तज्ज्ञ अभियंत्यांच्या क्षमतेवर तुमचा विश्वास नाही का ? ” ‘आधी डांगे चौक कोंडीमुक्त करा’नगरसेविका चोंधे यांनी खासदारांना खोचक सल्ला देताना म्हटले की, वाकड-बालेवाडी पुलाप्रमाणेच हा पूलही ‘भिजत घोंगडे’ ठेवून बारणे यांना नेमका कोणाचा विकास करायचा आहे, हे त्यांनी स्पष्ट करावे. “रक्षक चौकावर बोलण्यापेक्षा त्यांनी आधी डांगे चौकातील सब-वेची वाहतूक कोंडी मुक्त करावी,” असा टोलाही त्यांनी लगावला.
कामाचा तपशील आणि उद्घाटन
आमदार शंकर जगताप यांच्या विशेष प्रयत्नातून हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. याविषयी चोंधे यांनी खालील माहिती दिली
प्रकल्प खर्च: सुमारे १९ कोटी रुपये (२०२४ ची निविदा).
क्षेत्र: विशालनगर, पिंपळे निलख, कस्पटे वस्ती आणि वाकड परिसर.
तांत्रिक बाजू: महापालिकेच्या अभियंत्यांनी ‘आयआरसी’ (IRC) नियमांनुसारच काम केल्याचा दावा केला असून तांत्रिक त्रुटींची शक्यता फेटाळली आहे.
उद्घाटन: पुलाचे काम पूर्ण झाले असून, लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे.
